हतनूर कालव्याजवळ पुन्हा माती वाहतूकदार माफियांचा ठिय्या : एक दिवसाच्या खंडानंतर आज पुन्हा उत्खनन सुरु

हतनूर प्रकल्प अधिकारी आंधळ्याच्या व बहिऱ्याच्या भूमिकेत

हतनूर कालव्याजवळ पुन्हा माती वाहतूकदार माफियांचा ठिय्या : एक दिवसाच्या खंडानंतर आज पुन्हा उत्खनन सुरु

प्रतिनिधी/रावेर

हतनूर प्रकल्पाच्या कालव्याला लागून कालव्यासाठी सोडलेल्या रस्त्याचे वाळू माफियांकडून भरदिवसा अवैध उत्खनन व मातीची वाहतूक होत आहे. याचे वृत्त शुक्रवारी प्रकाशित होताच शनिवारी माफियांनी येथून गाशा गुंडाळला होता. मात्र पुन्हा एका दिवसाच्या खंडानंतर आज पुन्हा जेसीबीद्वारे उत्खनन करण्यात येत असून डंपर व ट्रक्टरद्वारे खुलेआम मातीची अवैध वाहतूक सुरु आहे. याचे हतनूर प्रकल्प व महसूल प्रशासनाला कोणतेही गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. हतनूर प्रकल्पाचे अधिकारी आंधळ्याच्या व बहिऱ्याच्या भूमिकेत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. कालव्यालगत होणाऱ्या अवैध उत्खननामुळे कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.  

अनेक दिवसापासून हतनूर कालव्यालगत अवैध उत्खनन सुरु आहे. हतनूर प्रकल्प अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याचे काहीही सोयरसुतक नाही. जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून डंपर व ट्रक्टरद्वारे राजरोसपणे या मातीची अवैधरीत्या वाहतूक होत आहे. यामुळे कालव्याला धोका निर्माण झाला असून कालवा फुटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.  रावेर तालुक्यातील उदळी, तासखेडा, रणगाव, गहुखेडा, सुदगाव, रायपूर या परिसरात काही वाळू व माती माफियांकडून हे अवैध उत्खनन सुरु आहे. दिवसा राजरोसपणे मातीची वाहतूक होत आहे. अवैध उत्तखनन व वाहतुकीमुळे कालव्याला धोका निर्माण झाला आहे. कालव्याची मातीची भिंत यामुळे कमकुवत होऊन कालवा फुटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

 हतनूर कालव्याजवळ पुन्हा माफियांचा ठिय्या  

हतनूर कालव्यालगत मातीचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरु असल्याची रणगाव, गहुखेडा व कालवा लगतच्या गावातील शेतकऱ्यांची तक्रार आहे. याकडे हतनूर प्रकल्प व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबतचे वृत्त शुक्रवारी प्रकाशित होताच शनिवारी सकाळी अवैध मातीची वाहतूक करणाऱ्यांनी गाशा गुंडाळून पालायन केले होते. तर मातीची वाहतूक केल्याचा पुरावा दिसू नये यासाठी वाहतूकदारांनी रस्ता झाडून स्वच्छ केला होता. काल दिवसभर येथे माती वाहतुकदारांनी फिरूनही पहिले नव्हते. मात्र एक दिवसाच्या खंडानंतर आज पुन्हा माती माफियांनी येथे बस्तान बसविले असून ठिय्या मांडला आहे. यावर कडक कारवाई करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.