गौरवास्पद : जैन इरिगेशनला निर्यातीसाठी राष्ट्रीय पुरस्कार : राष्ट्रपतींच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याहस्ते सन्मान
जैन इरिगेशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
नवी दिल्ली / प्रतिनिधी
कृषीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात जैन इरिगेशन प्रभावीपणे काम करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवणाऱ्या जैन इरिगेशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला निर्यातीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ५६ व्या ईईपीसी इंडिया नॅशनल एक्सपोर्ट अवॉर्ड्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंडस्ट्रीयल मशनरी अँड इक्यूपमेंट लार्ज एन्टरप्राईजेस गटात उत्कृष्ट निर्यातबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते सन्मानपूर्वक हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन आणि जैन फार्मफ्रेश फुड लि. चे संचालक अथांग जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या सोहळ्यास वाणिज्य व उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद, वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल व ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष पंकज चड्डा उपस्थित होते. जैन इरिगेशनला मिळालेला हा पुरस्कार भारताच्या अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रातील कंपनीच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे द्योतक आहे.
६० वर्षापासून निर्यातीत योगदान
जैन इरिगेशन कंपनी केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर सूक्ष्म सिंचन, प्रक्रिया उद्योग, सौरऊर्जा, प्लास्टिक पाइप्स आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात अग्रगण्य स्थान राखते. गेल्या साठ वर्षांहून अधिक काळात कंपनीने निर्यात क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि जगातील विविध देशांपर्यंत आपली उत्पादने आणि तंत्रज्ञान पोहोचवले आहे. अत्याधुनिक संशोधन, गुणवत्ता आणि शाश्वत कृषी विकासाच्या मूल्यांवर आधारित कार्यपद्धतीमुळे जैन इरिगेशनने लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे आणि जागतिक ग्राहकांचा विश्वासही संपादन केला आहे. या सन्मानाबद्दल कंपनीचे अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, शुभचिंतक आणि सहकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. इंजिनीअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया (EEPC India) ही भारतातील अभियांत्रिकी आणि तांत्रिक उत्पादक कंपन्यांच्या निर्यातीला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारी प्रमुख संस्था आहे, जी दरवर्षी विविध श्रेणींमध्ये निर्यातदारांचा सन्मान करून त्यांना प्रेरणा आणि बळ प्रदान करते.
“हा पुरस्कार केवळ आमच्या कंपनीचा सन्मान नसून भारताच्या कृषी आणि औद्योगिक प्रगतीचा गौरव आहे. हा सन्मान शेतकरी बांधवांना आणि कंपनीतील सहकाऱ्यांना समर्पित करतो. ज्यांच्या अथक परिश्रमामुळेच ही उपलब्धी शक्य झाली आहे. निर्यात क्षेत्रात जैन इरिगेशनचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ही एक सामूहिक यात्रा आहे, जी नवोन्मेष, गुणवत्ता आणि शाश्वत विकासावर आधारित आहे. यामुळे भविष्यातही भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकेल.”
---- अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव

krushisewak 
