अधिकारी म्हणतात वसुलीचे टार्गेट : वाळू माफिया म्हणतात अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण तडजोड : हतनूर कालव्याला धोका : कालव्याच्या भरावाच्या मातीचे अवैधरीत्या उत्तखनन व वाहतूक
प्रकल्प अधिकारी, महसूल व पोलीस विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

प्रतिनिधी/रावेर
हतनूर प्रकल्पाच्या कालव्याला लागून कालव्यासाठी सोडलेल्या रस्त्याचे वाळू माफियांकडून भरदिवसा उत्तखनन सुरु आहे. हतनूर प्रकल्प अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून डंपरद्वारे राजरोसपणे या मातीची अवैधरीत्या वाहतूक होत आहे. यामुळे कालव्याला धोका निर्माण झाला असून कालवा फुटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हतनूर प्रकल्पातून शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचणासाठी कालवा कार्यरत आहे. हा कालवा हतनूर धरणापासून निघून रावेर, यावल व चोपडा तालुक्याला जोडलेला आहे. हा कालवा रावेर तालुक्यातील उदळी, तासखेडा, रणगाव, गहुखेडा, सुदगाव, रायपूर या परिसरातून जातो. कालव्याची देखभाल व दुरुस्ती वेळीवेळी करण्यासाठी कालव्याच्या एका बाजूने मातीचा भराव देऊन रस्ता करण्यात आलेला आहे. मात्र काही वाळू माफियांनी हतनूर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संगणमत साधून या रणगाव, थोरगव्हाण परिसरात कालव्याला भराव दिलेल्या मातीचे जेसीबीने अवैधरीत्या उत्तखनन करीत दिवसा राजरोसपणे 15 ते 20 डंपरद्वारे मातीची वाहतूक करीत आहेत. मोठ्या प्रमाणावर कालव्याच्या मातीच्या होणाऱ्या या अवैध उत्तखनन व वाहतुकीमुळे कालव्याला धोका निर्माण झाला आहे. कालव्याची मातीची भिंत यामुळे कमकुवत होऊन कालवा फुटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
महसूल विभागाचा कानाडोळा
अवैधरीत्या वाहतूक होणाऱ्या गौण खनिजावर महसूल विभाग कारवाई करतो. मात्र रात्रंदिवस डंपरद्वारे मातीची अवैधपणे वाहतूक होत असतांना महसूल विभागाच्या प्रमुखांना याची माहिती नसावी ही सर्वसामान्य नागरिकाला न पटणारी बाब आहे. महसूल विभागाचा याकडे कानाडोळा झालेला दिसतो. गेल्या पंधरा दिवसापूर्वी रोझोदा रस्त्यावर अवैध मातीची वाहतूक करणारे डंपर महसूल विभागाने पकडले होते. मात्र कारवाई न करता आर्थिक तडजोड करण्याचा प्रयत्न यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र नागरिकांच्या जागरूकतेमुळे हा प्रयत्न फसला होता. व अखेर या डंपरवर कारवाई करण्याची नामुष्की महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर ओढवली होती. यामुळे याठिकाणच्या अवैध माती वाहतुकीला महसूलचा वरदहस्त असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
हतनूरच्या अधिकाऱ्यांचा शहाजोगपणा
हतनूर कालव्याची देखभाल व दुरुस्ती तसेच संरक्षणाची जबाबदारी हतनूर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे कालव्यालगत होणारे उत्तखनन व मातीच्या अवैध वाहतुकीवर याच विभागाने कारवाई केली पाहिजे. मात्र या विभागाने स्वतः कारवाई न करता महसूल विभाग व सावदा पोलीस ठाण्याला कारवाई करण्याबाबत पत्र दिले आहे. हा हतनूर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचा शहाजोगपणाच म्हणावा लागेल.
अधिकारी म्हणतात वसुलीचे टार्गेट तर माफिया म्हणतात अधिकाऱ्यांशी तडजोड
अवैध उत्तखनन व वाहतुकीवर कारवाईबाबत हतनूर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता कारवाई करण्यासाठी कर्मचारी पुरेसे नाही, तसेच वसुलीचे टार्गेट आहे ते पूर्ण करायचे आहे असे उत्तर मिळाले. तर अधिकाऱ्यांशी आर्थिक तडजोड केली आहे त्यामुळे कारवाई कोण करेल असे उत्तर अवैध गौण खनिज वाहतूक करणारे माफिया देतात. त्यामुळे या दोघांमध्ये सेटलमेंट असावी अशी शक्यता उघडपणे दिसते.
"हतनूर कालव्या लगत अवैधरीत्या उत्तखंनं व मातीची डंपर द्वारे वाहतूक होत असल्याचे आमच्या निदर्शनास आलेले आहे. मात्र मनुष्यबाळाचा अभाव असल्याने कारवाई करताना अडचणी येतात. महसूल व पोलीस विभागाला कारवाई करण्याबाबत पत्र दिले आहे."
----जी एस चौधरी, उप अभियंता, हतनूर प्रकल्प
* उद्या वाचा...खिरोदा, पाल परिसरात अवैध गौण खनिज वाहतुकीला कोणाचा आशीर्वाद.