रावेरला दानापुर-पुणे आणि झेलम एक्सप्रेस थांबविण्याची मागणी ; दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या जिएमची भेट घेत दिले निवेदन

गाडयांना स्टॉप देण्याचे जिएम मीना यांचे आश्वासन

रावेरला दानापुर-पुणे आणि झेलम एक्सप्रेस थांबविण्याची मागणी ; दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या जिएमची भेट घेत दिले निवेदन

रावेर/प्रतिनिधी 

रावेर येथील स्टेशनवर दानापूर पुणे व झेलाम एक्सप्रेस या गाडयांना थांबा मिळावा यासाठी दिव्यांग संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे. मागील महिन्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भुसावळ विभागाच्या डीआरएम इति पांडे यांची भेट घेवून या मागणीचे निवेदन दिले होते. तर आज शुक्रवारी रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना हे भुसावळ दौऱ्यावर आले असता दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी संजय दिनकर बुवा, रजनीकांत बारी, घनश्याम हरणकर, नाना मोची, नितीन महाजन, पवन शिरनामें, विजय बारी, चंदू नेहेते यांच्यासह दिव्यांग पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दुपारी भेट घेतली. यावेळी या गाड्यांच्या थांब्याची निवेदन देत मागणी केली. यावेळी भुसावळ विभागाच्या डीआरएम इति पांडे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

रावेर हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून तालुक्याचे मुख्यालय आहे. केळी उत्पादनात देशात अग्रस्थानी असलेल्या या तालुक्यातून दररोज उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात केळी रेल्वेद्वारे पाठवली जातात. त्यामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. मात्र, पुण्याकडे जाणाऱ्या दानापुर-पुणे एक्सप्रेस आणि जम्मूतवी-पुणे झेलम एक्सप्रेस या गाड्यांना रावेर स्थानकावर थांबा नसल्यामुळे स्थानिक प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि उपचारांसाठी दररोज रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या १२०० ते १५०० दरम्यान आहे. सध्या या प्रवाशांना खासगी बससेवा आणि दोन एसटी बसवर अवलंबून राहावे लागते.यामुळे त्यांना ९०० ते १००० रुपयांपर्यंतचा खर्च आणि वेळेची हानी सहन करावी लागते. परिणामी खासगी बस व्यवसायिकांना दररोज दहा लाखांहून अधिक उत्पन्न मिळते, तर रेल्वेला मोठ्या प्रमाणात संभाव्य महसुलापासून वंचित राहावे लागत आहे.

इटारसी-भुसावळ मेमुची वेळ सकाळी करावी

यासोबतच, पूर्वी सुरू असलेली इटारसी-भुसावळ पॅसेंजर ट्रेन बंद झाल्यामुळे सकाळच्या वेळात भुसावळ आणि जळगावकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही अडचण होते. सध्या चालू असलेली इटारसी-भुसावळ मेमो एक्सप्रेस मध्यरात्री नंतर पहाटे आहे. जी प्रवाशांना लाभदायक ठरत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सकाळी सात ते आठ वाजे दरम्यान ही गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने दानापुर-पुणे एक्सप्रेस आणि जम्मूतवी-पुणे झेलम एक्सप्रेस दोन्ही एक्सप्रेस गाड्यांचा रावेर स्थानकावर थांबा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था तर्फे रजनीकांत बारी, संजय बुवा, पवन शिरनामे, विजय बारी, पुंडलिक महाजन, प्रवीण बारी, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्याकडे आज करण्यात आली आहे.