माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी फुलवली खजुराची शेती
केळीच्या आगारात आता खजुराचेही उत्पादन

कृष्णा पाटील / रावेर
माजी महसुल व कृषी मंत्री, प्रयोगशील शेतकरी असलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांचे शेतीवरील प्रेम आजही पाहायला मिळते. राजकारण करत असताना त्यांनी स्वतःच्या शेतीत वेगवेगळ्या पिकांची लागवड करीत शेतकऱ्यांना चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पंधरा एकरवर खजुराची बाग फुलवली असून या बागेतील खजुराला देशभरातील बाजारपेठेतून आता मागणी होत आहे. केळीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात खजूर शेतीचा हा अनोखा प्रयोग माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राबविला आहे.
राष्टवादीचे नेते, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे राजकारणात गेल्या चाळीस वर्षांपासून सक्रिय आहेत. या क्षेत्रात ते मास लिडर म्हणून ओळखले जातात. मात्र याचबरोबर त्यांची एक प्रयोगशील शेतकरी म्हणून सुद्धा राज्यात ओळख आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल याबाबत आपल्या शेतात ते सतत नवनवीन प्रयोग करत असतात. फळबाग, जलसंधारण, यांत्रिकीकरण यासह सिडलेस जांभूळ, आखाती बरही खजूर लागवडीचा दिशादर्शक प्रयोग त्यांनी आपल्या शेतात केला आहे.
१५ एकरवर खजुराची लागवड
एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या शेतातील १५ एकरवर बरही जातीच्या खजुराची लागवड केलेली आहे. त्यांच्या शेतातली खजुराची बाग फुलली असून अता उत्पादन घेतले जात आहे. या उत्पादनाला स्थानिक बाजारपेठेशिवाय मुंबई, पुणे, कलकत्ता शहरातील व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी होत असल्याचे त्यांच्या कन्या व जिल्हा बँकेच्यामाजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सांगितले.
केळीला पर्याय ठरेल खजूर शेती
जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून ओळखला जातो. परंतु मागील काही वर्षांपासून वादळ, जास्त तापमान, सिएमव्ही या कारणाने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. योग्य भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. केळी, कापूस या पारंपरिक पिकाला पर्याय म्हणून माजी कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या मुक्ताईनगर येथिल शेतात आखाती बरही खजुराची लागवड केली आहे. हि शेती केली व कापूस पिकाला पर्याय ठरू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आखाती देशातून रोपे आणली
खजूर लागवडीसाठी खडसे यांनी आखाती देशातून विमानाद्वारे बरही जातीच्या खजुराची रोपे आयात केली. त्यांची मुक्ताईनगर येथिल शेतात पंधरा एकरावर लागवड केली असून यात नर आणि मादी खजूर रोपांचा समावेश आहे. एकदा लागवड केल्यानंतर तिन वर्षांनी झाडाला फळे येतात. झाडांची वाढ होते तशी फळे अधिक मिळतात. प्रति झाडाला ६० ते ८० किलो फळे येतात. याला स्थानिक बाजार पेठेत १०० ते १२० रुपये प्रति किलो दर मिळतो. झाडाची फळे पिवळी धमक असुन चवदार, शर्करायुक्त आहेत. देशात गुजरात, राजस्थान राज्यात खजुर रोपांची उपलब्धता आहे. परंतु या राज्यातील रोपांच्या खजुराची चव हि तुरट आहे. आखाती देशातून मागवलेल्या खजुर रोपांच्या खजुराची चव गोड आहे. गेले चार वर्षांपासून खडसे हे खजुराचे पिक घेत आहेत
प्रोसेसिंग युनिट उभारणार
आगामी काळात प्रोसेसिंग युनिट उभारण्याचा खडसे यांचा निर्णय असून ओल्या खजुरावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यापासून खारीक, कोरडा खजूर आणि इतर उपपदार्थ निर्मितीचा एकनाथराव खडसे यांचा मानस आहे. त्यामुळे अधिक उत्पादन मिळू शकेल. बरही खजुराच्या लागवडीचा खर्च मुख्य आहे. पुढे तो कमी आहे. शिवाय यात उडीद मुग कापूस असे आंतरपीक सुद्धा घेता येऊ शकते
पारंपरिक पिकांपेक्षा अधिक उत्पादन देणाऱ्या खजूर शेतीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वळावे. त्यामुळे उत्पादित शेतमालावरील नुकसानीचा धोका कमी होऊन या पिकांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळेल. यासाठी शासनाने बरही खजुर पिकाविषयी शेतकरी बांधवांना माहिती देऊन फलोत्पादन योजनेत समावेश करून त्याला अनुदानावर रोपे उपलब्ध करून द्यावेत, पीकविमा संरक्षण द्यावे.
---एकनाथराव खडसे, माजी मंत्री तथा प्रयोगशील शेतकरी मुक्ताईनगर