रावेर पोलिसांचे गोसंरक्षण : कत्तलीसाठी जाणाऱ्या 18 बैलांना पाच दिवसात जीवदान : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मध्यप्रदेशातून अवैधरित्या गोवंशाची वाहतूक

रावेर पोलिसांचे गोसंरक्षण : कत्तलीसाठी जाणाऱ्या 18 बैलांना पाच दिवसात जीवदान : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी / रावेर 

मध्यप्रदेशातून रावेरमार्गे जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर कत्तलीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर गोवंशाची अवैधरित्या वाहतूक केली जाते. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी याविरुद्ध कारवाईची मोहीम उघडली असून पाच दिवसात कत्तलीसाठी जाणाऱ्या तब्बल 18 बैलांची त्यांनी सुटका केली आहे. या गोवंशाला जीवदान देत त्यांची रवानगीदेखभाल व संगोपणासाठी गोशाळेत करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11 मार्चला लालमाती, खिरोदा रसलपूर या मार्गाने आरोपी हुसेन अब्दुल रहेमान तडवी व कादिर अब्दुल रहेमान तडवी दोघे रा पाल हे सुमारे 3 लाख 70 हजार रुपये किमतीचे 14 बैल एकमेकांशी दोराने घट्ट बांधून काठीने मारून हाकलत कत्तलीच्या उद्देशाने नेत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मिळाली होती. त्यानुसार डॉ जयस्वाल यांनी एपीआय अंकुश जाधव, पीएसआय घनशाम तांबे, पोलीस कर्मचारी सतीश सानप, संभाजी बिजागरे, राहुल परदेशी, होमगार्ड राहुल कासार यांचे पथक पाठवले. यावेळी पोलीस दिसताच आरोपी पळून गेले असून कत्तलीसाठी जाणाऱ्या 14 बैलांना येथील द्वारकाधीश गोशाळेत देखभाल व संगोपणासाठी रवाना केले आहे. तर आज शनिवारी मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या सोलाबर्डी गावातून कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या 4 बैलांची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दुपारी साडेचार वाजता सांबारपट मंदिराच्या पुढे कच्च्या रस्त्याने आरोपी शेख साबीर शेख मोती रा रसलपूर हा निर्दयीपणे काठीने मारहाण करीत हे बैल घेवून जात होता.याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मिळाल्यावर त्यांनी पीएसआय तुषार पाटील, पोलीस कर्मचारी जगदीश पाटील, हमीद तडवी, अतुल गाडीलोहार, संदीप पाटील यांचे पथक पाठवून ही कारवाई केली आहे. 

पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या पाच दिवसातील धडक दुसऱ्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. सुमारे साडेचार लाख रुपये किमतीच्या 18 बैलांना जीवदान देण्यात रावेर पोलीस प्रशासन यशस्वी झाले आहे.